शिक्षकांच्या बदली संदर्भात महत्वाचे, १२ हजार शिक्षक आंतर जिल्हा बदली आता… – teachers transfer list 2025
teachers transfer list 2025
राज्यातील जिल्हा परिषदेतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची दरवर्षी राबविण्यात येणारी संगणकीय बदली प्रक्रिया मागील तीन वर्षांपासून रखडल्याने स्वगृह जिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावर कर्तव्य बजावणारे १२ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. या शिक्षकांच्या न्याय हक्कास्तव प्रहार शिक्षक संघटना आक्रमक झाली असून, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची मागणी संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच महत्वाचे नोकरी अपडेट्स साठी या लिंक वरून आपण आमच्या रोजगारसंधी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
१० ते १५ वर्षांपासून आपल्या कुटुंबांपासून कोसो दूर अंतरावर कर्तव्य बजावणाऱ्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांची संगणकीय प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ग्राम विकास विभागाने प्रहार शिक्षक संघटनेच्या सततच्या संघर्षानंतर प्रथमच २०१७ पासून सुरू केली. आंतरजिल्हा बदलीचे संगणकीय धोरण अंमलात आल्यापासून २०२२ पर्यंत या प्रक्रियेचे सहा टप्पे शासनाने राबविले. प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या सततच्या पाठपुराव्याने राज्यातील १२ हजार ५०० शिक्षकांच्या सहा टप्प्यांत स्वगृह जिल्ह्यात बदल्या झाल्या. राज्यातील ३५ जिल्हा परिषदेंतर्गत ही बदली प्रक्रिया पार पडली. हजारो शिक्षक आपल्या कुटुंबाजवळ गेल्याने या बदली प्रक्रियेने सुखावले. मात्र, मागील तीन वर्षांपासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शासन स्तरावरून रखडल्याने बदली प्रतीक्षेतील बारा हजार शिक्षकांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे.
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा तत्काळ सुरू करण्याबाबत प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे व प्रधान सचिवांना निवेदन सादर केले असून, या निवेदनातून त्यांनी शासनाने २८ फेब्रुवारी रोजी परिपत्रकानुसार सर्व जिल्हा परिषदांना शिक्षक संवर्गाचे रोस्टर अद्ययावत करण्याचा निर्देश दिला; मात्र अनेक जिल्हा परिषदांनी आजतागायत रोस्टर अद्ययावत केले नाही. यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला विलंब होत असून, शिक्षकांमध्ये संभ्रम आणि रोष वाढत असल्याचे नमूद केले आहे. सोबतच बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रमुख सात मागण्या त्यांनी आपल्या निवेदनात दिल्या आहेत.
